पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला स्थगिती   

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती

पुणे : इयत्ता पहिलीपासून तृतीय भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्यास्थितीत प्रचलित पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाईल. हिंदीच्या सक्तीबाबत राज्यातील अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षकांकडून सूचना आल्या आहेत. या सुचनांचा विचार करून, सुधारित निर्णय प्रसिद्ध करण्यात येईल,  अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी रविवारी दिली.
 
दादा भुसे यांनी पुणे बाल पुस्तक जत्रेला भेट दिल्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासचे विश्वस्त राजेश पांडे, सागर वैद्य आदी उपस्थित होते. बालभारतीने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार शालेय शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीबाबत संभ्रम निर्माण झाल्याची विचारणा भुसे यांना करण्यात आली. त्यावर भुसे म्हणाले की, हिंदी भाषेचा समावेश करण्याबाबतच्या निर्णयाला स्थगिती दिली असून, याबाबत कोणतेही दुमत असू नये. काही शिक्षणतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तिसरीपासून हिंदी भाषेचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो, तर काहींनी निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत सूचना केल्या आहेत. अभ्यासकांनी दोन्ही बाजुंनी मते प्रदर्शित केली आहेत. या सर्व सूचनांचा विचार करून, शिक्षण विभागाकडून निर्णय प्रसिद्ध करण्यात येईल, असे भुसे यांनी स्पष्ट केले. भुसे म्हणाले की, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानेही (सीबीएसई) इंग्रजीसोबतच प्रादेशिक भाषांना महत्त्व दिले आहे. त्यानुसार राज्यातील सीबीएसई शाळांना इंग्रजीसोबतच मराठी भाषेचे शिक्षण देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी यंदापासून सक्तीने करण्यात येईल, असेही भुसे यांनी सांगितले.
 
इयत्ता चौथी आणि सातवीला शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याबाबत अभ्यास सुरू आहे. त्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय अजून झालेला नाही, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली. त्यामुळे सध्याची इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वीप्रमाणेच चौथी आणि सातवीला होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
आजपासून अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरु; इनहाऊस कोट्याबाबत संस्थाचालकांच्या सूचनांचा विचार करणार राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येणारी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आज सोमवारपासून सुरू होत आहे. ही प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असून, गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय देणारी आहे. केवळ १०० रूपये भरून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल. काही दिवसांपूर्वी तांत्रिक अडचण उद्भवल्याने, प्रवेश प्रक्रिया स्थगित झाली होती. मात्र, सोमवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. इनहाऊस कोट्याबाबत संस्थाचालकांना काही सूचना करायच्या असल्यास, त्यांनी कराव्यात. त्यांच्या सुचनांचा विचार करून निर्णय जाहीर करण्यात येईल, असे भाष्य मंत्री दादा भुसे यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या गोंधळावर आणि इनहाऊस कोट्याच्या बदललेल्या नियमाबाबत केले.

Related Articles